Thursday, January 15, 2009

उत्तर

आई,

आता मी जे लिहिणार आहे, त्यासाठी तुझ्या मनाची तयारी कशी करावी मला समजत नाही.
थेटच लिहितो.

आई गं, मी आत्महत्या करतोय.

फक्त वाटलं की मी हे का करतोय हे तुला माहीत असायला हवं. आणि तुला न सांगता कधी कुठे गेलो नाही ना. खरंतर तेवढ्यासाठीच घरी आलो काल रात्री. नाहीतर कदाचित तेव्हाच –
शिवाय लिहून ठेवलेलं असलं की पोलीस केस वगैरे झाली तर तुझ्या आणि अभिच्या बाबतीत शंकेला जागा राहणार नाही ना.

काल सकाळी प्रोजेक्ट प्रेझेंटेशनसाठी कॉलेजला गेलो तेव्हा तू पाहिलंस ना माझ्या गळ्यातली बॅग कसली जड झाली होती. प्रोजेक्ट रिपोर्टच्या कॉपीज, प्रेझेंटेशनच्या स्लाईड्स, काय काय होतं त्यात. गेले सहा महिने केलेल्या ढोरमेहनतीचे पुरावे. चांगल्या ग्रेड्सवरचा, चांगल्या जॉबवरचा क्लेम.

गर्दीचीच वेळ होती. ट्रेनमधे चढताना फूटबोर्डवरचा मधला बार असतो ना, त्याच्याभोवती माझ्या बॅगचा पट्टा अडकला. बारच्या एका बाजूला मी आणि दुसर्‍या बाजूला बॅग. मलाही त्यामुळे नीट आत शिरता येत नव्हतं आणि दुसर्‍या बाजूलाही एक जण त्या अडनिड्या बॅगमुळे अडकला होता. पाय फूटबोर्डवर जेमतेम टेकवलेला, हाताने कसाबसा बार घट्ट धरलेला – असा तो जवळपास बाहेरच लोंबकळत होता. तो ओरडून ओरडून मला सांगत होता की बॅग सोडा, नाहीतर मी पडेन.

आणि आई, माझ्याच्याने इतक्या पटकन, इतक्या सहज ती बॅग टाकवेना. मी सोडतो सोडतो म्हणत म्हणत तो क्षण थोडा – थोडासाच - लांबवला. पण तेवढ्याने उशीर झाला गं. त्याचा पाय तेवढ्यात निसटला फूटबोर्डवरून. धपकन आवाज झाला. डब्यातल्या कलकलाटात त्याची किंकाळीसुद्धा विरून गेली. गाडीने प्लॅटफॉर्म नुकता सोडला होता नव्हता – खालच्या लोकांचा आरडाओरडा ऐकू आला, तेव्हा गाडीतले लोक म्हणायला लागले, कोई गिर गया लगता है बेचारा – ट्रेन मत रोको – लेट हो जायेगा – वो अब वापस थोडेही आयेगा! पण गाडी थांबलीच. मग तीच लेट होणारी लोकं ट्रेनमधून उड्या मारून कोंडाळं करून त्याचं ते छिन्नविच्छिन्न शरीर बघत उभी राहिली. माझे पाय लटपटत होते. कसाबसा प्लॅटफॉर्मवरच्या बाकड्यावर जाऊन बसलो. सुन्न झालो होतो.

जरा भानावर आल्यावर पहिला विचार मनात आला तो काय होता माहीत आहे? रिलीफचा होता आई! हे आपल्यामुळे झालं, हे आपण सोडून कोणालाही माहीत नाही – याचा रिलीफ!

मग सुचलं हळहळणं वगैरे! ते ही किती? पाचेक मिनिटंच गेली असतील. मग कॉलेज, प्रेझेंटेशन, होणारा उशीर सगळं आठवलं. उठलो, एक कप गरम कॉफी प्यायलो. स्वतःला सांगितलं, तू बॅग सोडणारच होतास – नव्हे, जवळपास सोडलीच होतीस.. पण तीच अडकली होती.. इतकी अवजड बॅग – कशी हलणार होती त्या गर्दीत? त्या माणसाने तरी – म्हणजे गेला हे वाईट झालं – पण कशाला इतकं जिवावर उदार होऊन चढायला हवं होतं? गर्दी आहे – होतातच या गोष्टी – आपली काळजी आपणच घेता यायला हवी होती त्याला! तू काय करणार?

असं स्वतःला समजावून, कॉफी पिऊन, पुढली ट्रेन पकडून कॉलेजला गेलो. सबमिशन्स झाली, प्रेझेंटेशन झालं, एक कँपस इन्टरव्ह्यूसुद्धा झाला. आणि चांगलाही झाला! आधी मनाशी म्हणत होतो, की कर्तव्य करतोय. आईने बाबांच्या मागे इतके कष्ट करून वाढवलं आपल्याला – आता आपण चांगलं पास होणं, चांगला जॉब घेऊन मार्गी लागणं हे तिच्यासाठी तरी करायलाच हवं, नाही का? आत्ता ते बाकीचे विचार करणं बरोबर नाही. व्हायचं ते होवून गेलं. हे आणि असंच बरंच काही. एकेक कामं हातावेगळी करत मग हळूहळू गुंततही गेलो त्यात. इन्टरव्ह्यू झाल्यावर अम्या आणि दिलीपबरोबर हॉटेलमधे खातपीत टाईमपास केला, दुसर्‍या दिवशी पिक्चरला जायचं ठरवलं, रिझल्टनंतर सेलिब्रेट कसं करायचं त्यावर गहन चर्चा केली, कुठल्या कंपन्या सद्ध्या हायर करतायत, कुणाची कुठे ओळख आहे, याचा अंदाज घेऊन झाला – हे सगळं करत असताना, आई, सकाळच्या प्रसंगाची मला आठवणसुद्धा नव्हती!!

स्टेशनवर आलो. ट्रेन प्लॅटफॉर्मला लागलेली पाहिली, आणि मग मात्र एकदम सगळा दिवस अंगावर आला माझ्या. हातपायच हलेनात. दोन-तीन ट्रेन अशाच गेल्या. पुढची पकडली कशीबशी. आता मी एकटा होतो. कुठे तोंड लपवायला जागाच उरली नाही असं वाटलं. डोकं भणाणून गेलं. मी असं कसं वागू शकतो? एक प्रेझेंटेशन आणि एक चालताबोलता माणूस – यात माझा प्रेफरन्स हा होता? इतक्या वेळात काही पश्चात्ताप, तो माणूस कोण असेल, त्याच्या घरच्यांचं काय होईल, आपण शोधावं का, त्यांना काही मदत करता आली तर पहावं का – असलं काहीसुद्धा माझ्या मनाला शिवलंसुद्धा नाही? आणि शोधता आलं नसतंही कदाचित – पण निदान तशी इच्छा व्हावी की नाही? नाही झाली. दिवसभरात नाही झाली. जशी एक क्षणसुद्धा बॅग सोडायची इच्छा नव्हती झाली, तशीच.

मी असा आहे? इतका स्वार्थी, इतका नीच आहे? माझ्या हातून एक जिताजागता माणूस मेल्यावरही मी ते विसरून खाऊपिऊ शकतो? माझ्या भविष्याचे – भविष्याचे सोड, सिनेमाचे प्लॅन आखू शकतो? मी कुणी पाहिलं नाही म्हणून हायसं वाटून घेऊ शकतो? याची टोचणी लागायलाही मला एक अक्खा दिवस जावा लागला? त्याच्या मागोमाग उडी नाही मारावीशी वाटली? मी माणूस म्हणवून घ्यायच्या लायकीचा आहे का? मी तुझा मुलगा म्हणवून घ्यायच्या लायकीचा आहे का? मी जगायच्या लायकीचा आहे का?

नाही, प्लीज उत्तर देऊ नकोस. तुझ्या उत्तराला घाबरलो म्हणून काल रात्री हे काही बोललो नाही. तू किंवा अभिने जर मला समजावायचा प्रयत्न केला असतात ना, तर माझा माणुसकीवरचाच विश्वास उडाला असता. तुला झाला प्रकार अक्षम्यच वाटलाय असंच उत्तर मी गृहित धरतोय. मी नाही तरी कोणीतरी तितकं सेन्सेटिव्ह आहे – हा दिलासा राहू दे मला.

मी अशी आत्महत्या करणं तुमचा विचार करता बरोबर आहे का? कदाचित नाही. ’तरी तुला अभि आहे’ असलं काहीतरी मी बोलणार नाही. पण अशी कल्पना कर की काल त्या माणसाच्या जागी फूटबोर्डवरून माझा पाय निसटला असता, तर हे चूक की बरोबर हा प्रश्न आला असता का?

हे असेच उलट सुलट विचार करत होतो रात्रभर. आणि जाणवलं की हा गिल्ट घेऊन जगणं आपल्याला अशक्य आहे. यानंतर जगलो तर वेडा तरी होईन, किंवा त्याहून भयंकर म्हणजे जगण्याच्या नावाखाली आणखी निर्ढावत जाईन. यापुढे चांगला वागेन वगैरेला काही अर्थ नसतो गं. आणि खरंच चांगला वागलो ना, तरी ते कालच्या प्रसंगाची भरपाई करण्यासाठीच वागतोय असंच वाटत राहील मला.

तुझ्या दुःखावर हे पत्र म्हणजे उत्तर नाही, हे मला कळतंय, आणि त्यासाठी फक्त क्षमा मागू शकतो. पण माझ्या प्रश्नांना दुसरं उत्तर सुचत नाही मला.


- अनिरुद्ध
१२ जानेवारी २००९

13 comments:

Anonymous said...

Surekh......
Lekh apratim aahe.....

assach lehit ja

Varsha said...

swaati,
I have already given a comment on maayboli about your story úttar''. kharach chhan lihili aahes. mastach ga.
aani mala tuzya blog cha layout, tyavaril photo (sunset cha) khup avadala. ekdum sahi.

Anonymous said...

It is too good. realy... I dont hv words to explain my feelings.....

Anonymous said...

मानवी भावनांचा ऊहापोह किती कठीण; आणि वेळप्रसंगी किती दाहक असतो नाही? हे "उत्तर" वाचल्यावर भीष्मासारखं शरपंजरी पडल्यासारखं वाटलं!

Ameya said...

ekhadyacha view asaa asu shakel evdhach maanya karto. pan majhyaa drushtini to chukichaa aahe. ekunach attachyaa competitive jagaat manaachi ghadan ashi jhaaliye ki swaarthi vichaar pahilaa yeto. pan ekaa kshanachyaa chukimule evdha motha apaghaat ghadu shakel he tevdhyaa velet kalu tari shakel kaa? majhya mate haa ek accident hotaa. accident baddal guilty vaatata he maanya aahe pan nantarchaa nirnay naahi.

evdhi reaction dyaaycha kaaran hech ki lekh titkaa effective hotaa.

-Ameya

Monsieur K said...

stirred quite a few emotions!! kudos to your writing style!!
in our mad rush towards achieving those goals in life.. do we end up forgetting basic human values...and if something goes terribly wrong... then begins the struggle in our mind to come to terms with it..

quite effective!
agree with Ameya.. even tho' i dont approve Aniruddha's decision to commit suicide.. you have captured the deliberations in his mind very effectively..

jamla tar 'Reservation Road' naavaachaa cinemaa bagh.. its about the story of a 'hit and run' accident.. i had penned a few thoughts on the same..
one of the protagonists in the movie goes thru a similar moral dilemma like aniruddha..

http://asach-aapla.blogspot.com/2009/01/blog-post_12.html

Anonymous said...

manat khup ultha palath honyasarakhach vishay ahe ani tu to mandla pan chan ahe,simply heart touchable.Just tell me is it really happened or it's just ur imagination? Whatever it may be but at this moment i'm "spellbound."

Abhi said...

शहारे शहारे आणि फक़त शहारे

भानस said...

स्वाती हे कथन मायबोलीवर आधी वाचले होतेच. आज पुन्हा वाचले. तू लिहीले आहेस छान ग, पण खूप वाईट वाटले. ही विचारसरणी रुजताच नये.

Pooja said...

Ek blog vachla ni rahavala nahi gela..pudhchehi vachat nighaley...
Apratim lekh ahe...
tumhi manvi bhavnanacha ashakya surekh chitran kelay..it just touched heart...my best wishes!!

Random Thoughts said...

Came across your blog today.
The line that hit the spot was
यापुढे चांगला वागेन वगैरेला काही अर्थ नसतो गं. आणि खरंच चांगला वागलो ना, तरी ते कालच्या प्रसंगाची भरपाई करण्यासाठीच वागतोय असंच वाटत राहील मला.
I watched "seven pounds" just a couple of days ago. And what I kept thinking about was if it wasn't for the terrible guilt would that character behave just the same?
And today I read your post.
But still my sympathies are with will smith's character in the movie and not the person who commits suicide. That's just my personal thinking anyways.
Great writing style. Enjoyed your blog. Will keep visiting.

विशाखा said...

अगदी आतून हलवलं ह्या लेखाने! आत्महत्येचा निर्णय चूक की बरोबर, ह्यापेक्षा, असे शेकडो निर्णय घ्यायची पदोपदी वेळ येत असते हे माणसाचं भागधेयच किती असह्य आहे?

Kanchan Karai (Mogaraafulalaa) said...

अजाणतेपणी घडलं तरी दुष्कृत्याचं समर्थन चांगलं वागून नाहीच होऊ शकत. पण अपराधीपणाची भावना मनात असूनही इच्छेविरुद्ध जगावंच लागतं कधी कधी. मरणापेक्षा तसं जगणं जास्त मरणप्राय वाटतं.